सातारा प्रतिनिधी | नवी मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यावरून साताऱ्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. साताऱ्याची निवडणूक महायुतीच्या हातून गेल्यामुळेच आपल्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात असल्याची प्रतिक्रिया मविआचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी दिली आहे, तर शशिकांत शिंदेंवर त्यांच्या कर्मामुळे ही वेळ आली असल्याची टीका खा. उदयनराजेंनी केली आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, सातारा लोकसभेची निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, ही निवडणूक त्यांच्या हातून गेलेली आहे. निवडणूक हातातून गेल्यावर काय करावं म्हणून आपल्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात येत आहेत. एपीएमसी मार्केटच्या शौचालय घोटाळ्या संदर्भात जो काही प्रचार केला जात आहे. तो चुकीच्या पद्धतीने अधिकाराचा वापर करून करण्यात येत आहे.
येत्या ७ मे रोजी मतदान झालं की ८ किंवा ९ तारखेला मी एपीएमसी मार्केट पोलीस स्टेशनच्या समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आ. शिंदे यांनी दिला आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा मला अधिकार आहे. सत्य लोकांच्या समोर यावं. मी दोषी असल्याचं सिध्द झाल्यास अटकही स्वीकारेन. पण, घटनेत सत्य नसताना उमेदवारची प्रतिमा मलीन करण्यासाठी खटाटोप सुरू आहे. मतदान झाल्यानंतर मी स्वतः पोलीस आयुक्तालयाच्च्या समोर उपोषणाला बसून लोकांच्या समोर सत्य आणणार असल्याचे आ. शिदे यांनी सांगितलं.
शशिकांत शिंदे यांच्या कर्मामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. शरद पवारांना १८ लाख लोकांमध्ये एकही चारित्र्य संपन्न उमेदवार मिळाला नाही, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्या संभाव्य अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.