प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती नकोच त्यामुळे राज्य शासनाने हट्ट सोडावा; साताऱ्यात शरद पवारांनी दिला सल्ला

0
192
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

सातारा येथे संपन्न रयत शिक्षण संस्थेचा AI CoE (AI Center of Excellence) ह्या शैक्षणिक उपक्रमाच्या शुभारंभ सोहळा आज पार पडला. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेतील बैठकीसाठी पवार हे सातारा दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले, हिंदी विरोधापेक्षा प्रथम मी एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) पाहतो. कारण, एआयचे फायदे आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांनाही एआयचे शिक्षण मिळावं याची काळजी घेतली पाहिजे. एआयचा शेती, उद्योग, शिक्षणातही फायदे आहेत. त्यामुळे केंद्र शासनानेही एआयला मान्यता दिलीय. राज्य शासनानेही ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर एआयचा वापर व्हायलाच हवा. यामुळे शेतकऱ्यांवरील ओझेही कमी होईल. तसेच रयत शिक्षण संस्थेनेही एआय वापरासाठी पुढाकार घेतला आहे. याचाही उपयोग होणारच आहे.

राज्यातील शिक्षणात हिंदीला विरोध होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पवार यांनी प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, असा सल्ला शासनाला दिला. तर महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे पदाधिकारी स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत, असा प्रश्नही पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी निवडणुकीबाबत आघाडीत चर्चा होणार आहे. बैठकीत निर्णय घेणार आहोत, असे उत्तर देत अधिक बोलणे टाळले. तर इस्त्रायल-इराण युध्दाबाबतही त्यांनी भारताला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असे मत मांडले.

आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही..

आणीबाणीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची जाहीर माफी मागितली होती. पुन्हा आणीबाणी उकरुन काढणे शहाणपणाचे लक्षण नाही. आणीबाणीला विरोध केलेल्यांच्या हातातच आता देशाची सत्ता असून ही वस्तूस्थिती आहे, अशी आठवणही शरद पवार यांनी भाजपला करुन दिली.