पाटणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री देसाईंचं मंत्रीपदाबाबत मोठं विधान; मुख्यमंत्री शिंदेकडे करणार ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे प्रत्यक्षात शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे मोठे विधान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे पाटण विधानसभा मतदार संघात एकच खळबळ उडाली आली.

सातारा लोकसभा मतदारसंघात पाटण तालुक्यातून महायुतीच्या उदयनराजे भोसले यांच्या पाटण तालुक्यातील मताधिक्यात घसरण होऊन विरोधी शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर येथील शताब्दी स्मारकामध्ये पार पडला.

या मेळाव्यास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पवार, अभिजित पाटील, भरत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, विजय शिंदे, अजय देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पाटण तालुक्यातून मताधिक्य घटले याचे शल्य आहे. उदयनराजे या निवडणुकीत विजयी झाले असले तरी शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सत्ता मिळवली. ती सत्ता जनतेला व कार्यकर्त्याना टिकवता आली नाही. यापुढील काळात संघटनेसाठी काम करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.