सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून ३० जून रोजी पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. माऊलीच्या पालखीचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, पालखी मार्गावरील सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागाचे प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, फलटण तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलटण उपविभागाचे उपअभियंता रविकुमार आंबेकर, लोणंद नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मधुमती कालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची, लोणंद मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नीरा नदीवरील दत्त घाट तसेच लोणंद येथील पालखी मुक्काम स्थळाची पाहणी करून तयारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पालखी सोहळा चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेनी उत्तम नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालखीतळ स्वच्छता, शौचालये, पाणी, आरोग्य, सुरक्षा, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपुर्ण बाबींमध्ये वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
लोणंद नगरपंचायतीला पालखी सोहळ्याच्या सुविधांच्या अनुषंगाने जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. पालखी मार्गावरील प्रशासनाने पालखी मार्गावर टँकरद्वारे पालखी तळावर वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा. पालखी मार्गावर स्थिर वैद्यकीय पथके, औषध साठा, रुग्णवाहिका सुविधेसह सर्प व श्वान दंश इंजेक्शन उपलब्ध ठेवावीत. वारकऱ्यांना सर्दी, ताप, खोकला आदी आजार असणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक तपासणीची व औषधे व्यवस्था आरोग्य पथकांकडे उपलब्ध ठेवावीत. महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपली अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. विद्युत जनरेटरची व्यवस्था ठेवावी.
जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील हद्दीतील सर्व शौचालय सुस्थितीत व स्वच्छ ठेवावीत. तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता ठेवावी.
पोलीस विभागाने पालखी आगमनावेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करून नियंत्रण ठेवावे. यासाठी अतिरिक बंदोबस्त तैनात करावा.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, पालखी प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयातील 10 टक्के बेड राखीव ठेवण्याची व्यवस्था करावी. पालखी मुक्कामी असणाऱ्या तळावर सायंकाळी पुरेसा विद्युत पुरवठा करावा. प्रसंगी जनरेटर ही उपलब्ध ठेवावेत, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी रस्त्यांच्या मार्गांची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.