सातारा प्रतिनिधी । दि. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. लोकांच्या मुलभूत अधिकारांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने लादली गेली होती. ही लोकशाहीची हत्या होती. या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने आणीबाणीच्या काळात झालेला संघर्ष. अनेकांनी सोसलेल्या यातना आणि लोकशाहीचा दैदिप्यमान वारसा या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने छत्रपती शाहुकला मंदिर नाट्यगृहा सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह आणीबाणीत सहभागी नागरिक, महिला उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, आपल्या घरादरांवर तुळशीपत्र ठेवून संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांच्या रक्षणासाठी ज्यांनी आणीबाणीला विरोध करत हालअपेष्टा भोगल्या सोसल्या प्रसंगी तरुंगवास भोगला अशांच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत. यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेली भारतातील लोकशाही आणि आणबाणीच्या कालखंडातील विविध घटनाक्रम यांचा मागोवा असणारे प्रदर्शन छत्रपती शाहुकला मंदिर नाट्यगृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास आणीबाणीतील संघर्ष योद्धे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह महसूल विभागातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.