साताऱ्यात दुचाकीला धडक देऊन गेला होता पळून;12 तासांच्या आत पोलीसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील हिट अँड रन प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या वाहन चालकाला 12 तासांच्या आत पकडण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी फत्ते केली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या टीमने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अपघात करून गेलेले वाहन व चालक यांना ताब्यात घेतले आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहराजवळ लिंबखिंड परिसरात शुक्रवारी सकाळी अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे लिंब (ता. सातारा) येथील प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ बाबू खादगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर खादगे यांचे नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. अपघात करुन गेलेल्या वाहन चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी निर्वाणीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन आरोपीला शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याच्या सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर ते सातत्याने निलेश तांबे यांच्याकडून तपासाबाबत माहिती घेत होते. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी अपघात करून गेलेल्या वाहनाच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या.

घटनास्थळापासून अगदी एक्सप्रेस हायवेपर्यंत प्रमुख ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. यातून अपघात करून जाणाऱ्या वाहनाची ओळख पटली. सीएनजी गॅसचा पुरवठा करणारा हा टाटा कंपनीचा तामिळनाडू पासिंगचा (टीएन 88 के 1282) ट्रक निघाला. त्यानंतर अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने या वाहनाचा माग काढण्यात आला.

पुण्याजवळ महामार्गावर पोलिसांनी हा मालट्रक पकडून वाहनचालक कुवरबहादूर नवलकिशोर सिंग (वय 26, अमोर, कानपूर, उत्तर प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या. पहाटे चार – सव्वा चारच्या दरम्यान वाहन व वाहन चालक यांना सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणले गेले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे, हवालदार शिवाजी डफळे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण आदींनी ही कामगिरी फत्ते केली.