ऐन पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील 6 गावे अन् 22 वाड्या तहानलेल्याच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी 6 गावे व 22 वाड्यांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. गावांमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पाणीपुरवठा विभागामार्फत 7 टँकरनी टंचाईग्रस्त गावांची तहान भागवली जात आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे 218 वर टँकरची संख्या पोहोचली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार वळवाच्या सरी कोसळल्या, तर जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे आटलेले पाणी स्रोत पुन्हा खळाळू लागले. गावोगावी टँकरची मागणी कमी होऊ लागली. त्यानुसार प्रशासनाने गावात जाऊन पाण्याची सद्यःस्थिती पाहूनच टँकर बंद केले. सध्या माण तालुक्यातील वरकुटे कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव यासह 22 वाड्यावस्त्यांमधील 11 हजार नागरिकांना 7 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी काही ठिकाणी कूपनलिका अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा व कराड तालुक्यांत सुरू असलेले पाणी टँकर बंद करण्यात आले आहेत.