सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे ‘संवाद तक्रारदारांशी’ उपक्रमाचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहभागातून ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम सातारा जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. २१ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात १० ते १ या वेळेत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात तक्रारदार नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस दल व जनता यांच्यामध्ये सौहादपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, तक्रारदारांच्या तक्रारींची योग्य व कायदेशीर दखल घेता यावी, तक्रारदारांना त्यांच्या तक्रारींचे निरसन न झाल्याने विनाकारण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार घेऊन जाऊ लागू नये तसेच पोलीस विभागाशी संबंधित सर्व समस्या तात्काळ सोडविता याव्यात, तसेच सैनिक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या तक्रारींचे निरसन प्राधान्याने करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांच्या ठिकाणी (सातारा, कोरेगाव, वाई, कराड, फलटण, पाटण, वडूज) दर १५ दिवसांनी म्हणजे महिन्यातील पहिल्या व तिसर्‍या गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या पोलीस विभागाशी संबंधित काही तक्रारी असल्यास ‘संवाद तक्रारदारांशी’ या उपक्रमात सहभागी होऊन मांडाव्यात, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.