जावळीच्या रांजणीवर भूस्खलनाचा धोका, घोटेघर-सुलेवाडीतील डोंगराला मोठमोठ्या भेगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाची संततधार कायम असून जमीन घसरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. जसजसे पावसाचे प्रमाण वाढत आहे, तसतसे पावसाचे पाणी या भेगांमध्ये जाऊन या भेगा रुंदावत चालल्या आहेत. डोंगरात रुंदावत चाललेल्या या भेगांमुळे २५ ते ३० एकराचा डोंगरच रांजणी गावाच्या दिशेने घसरत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगरावर असलेल्या सुलेवाडी लोकवस्तीतील लोक भीतीच्या छायेखाली वास्तव्य करीत आहेत.

जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या घोटेघर- सुलेवाडी येथील डोंगराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यात पावसाचे पाणी जात असल्याने जमीन निसरडी होऊन भूस्खलन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या रांजणी गावावर भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी माळीणसारखी स्थिती झाल्याने रांजणी व सुलेवाडीचे लोक जीव मुठीत घेऊन मुसळधार पावसात जीवन कंठीत आहेत.

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असून, सद्यस्थितीत जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पाचगणी-भिलारपासून जवळच असलेल्या सुलेवाडीत सुमारे २५०-३०० लोकांची वस्ती आहे. या वस्तीच्या खालच्या बाजूला डोंगरमाथ्यावर असणाऱ्या २५ ते ३० एकर क्षेत्रात शेतजमीन व डोंगर उताराला दीड ते दोन किलोमीटर लांब व दीड ते दोन फूट रुंद भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या या भागात पावसाची संततधार सुरू असून, या पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी जाऊन त्या आणखी रुंद होऊ लागल्या आहेत. त्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. हा अख्खा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर ढासळणार असून, गावच या मातीच्या ढिगार्‍याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रांजणीचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, तर सुलेवाडी लोकवस्तीतील लोक भेदरलेल्या अवस्थेत आहेत.

२०१९ मध्ये याच ठिकाणी डोंगराला पडल्या होत्या भेगा

सुलेवाडी येथे २०१९ मध्ये याच ठिकाणी डोंगराला अशाच मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. या वेळी सुलेवाडी गावातील काही लोकांना आपत्कालीन व्यवस्थापनाने काळजी घेत तात्पुरते स्थलांतरित केले होते, तर रांजणी येथील ६० लोकांसाठी निवारा शेड उभारले होते. मात्र, ती अद्यापही आपतग्रस्तांना देण्यात आली नसल्याचे संभाव्य पीडित लोकांनी सांगितले. तसेच निवारा शेडची कामेही थोड्याफार प्रमाणात अपूर्ण असल्याने ती संभाव्य आपतग्रस्तांना दिली नाहीत.