सातारा प्रतिनिधी | श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव कै. प्राचार्य एन जी गायकवाड लिखित ‘साफल्यगाथा एका अमृतपेशाची ‘ पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ह.भ.प महंत प्रमोद महाजन जगताप तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमासाठी डॉ बाबुराव गुरव, मा प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, मा मुरलीधर गावडे , मा प्राचार्य एस.के कुंभार तसेच शैक्षणिक , सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे ह.भ.प प्रमोद महाराज जगताप आपल्या भाषणात म्हणाले, पोटाची भूक अन्नाने पूर्ण होते मात्र विचारांची भुक पुस्तकानेच क्षमते. ज्ञानेश्वर निवृत्तिनाथाबद्दल त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाबद्दल आदर व्यक्त करताना म्हणतात, तैसे श्री निवृत्ति नाथाचे। गौरव आहे जी साचे ।ग्रंथ नोहे हे कृपेचे । वैभवतये ।। त्याप्रमाणे कै. प्राचार्य एन जी गायकवाड यांनी यांनी लिहिलेले साफल्यगाथा एका अमृतपेशाची हे पुस्तक त्यांचे गुरु शिक्षणमहर्षीं डॉ. बापूजी साळुंखे यांचे चरित्रच आहे. त्यामुळे ते एक आत्मकथन आहे. त्यांनी 70 वर्षाच्या आयुष्याचा लेखाजोखा यात मांडला आहे. शिक्षकत्व एक व्रत आहे. तो एक पेशा आहे किंबहुना एक अमृतपेशा आहे या अमृत पेशामध्ये स्वतःचे संपूर्ण जीवन आप्पांनी समर्पित केले.
कै.आप्पा हे उत्तम श्रोता होते. ते जरी शरीराने वागत असले तरी व्यवहारात त्यांच्या कुडीमध्ये डॉ. बापूजींचाच आत्मा होता. बापूजींच्या तालमीत आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या कुशल अशा मातृत्वात त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले.त्यामुळेच त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सार्थक झाले. या पुस्तकात त्यांनी पूर्वार्धात कर्तृत्वाची गाथा उत्तरार्धात गुरु विषयीचे चरित्र आणि समारोपात कुटुंबाचे चित्रण केले आहे. या पुस्तक निर्मितीमध्ये आप्पांच्या धर्मपत्नीचे ही तेवढेच मोठे योगदान आहे. मात्र हा ग्रंथ तयार करण्यासाठी परिश्रमपूर्वक आठ वर्ष लागली. त्यांच्या हयातीत ग्रंथाचे प्रकाशन करता आले नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे आपल्या भाषणात म्हणाले, कै नारायणराव यांनी डॉ.बापूजी सोबत आणि त्यानंतर माझ्याबरोबर संस्था जडणघडणीत मोलाचे योगदान दिले.त्यांचे आदर्श बापूजी होते. त्यांनी बापूजींच्या कार्यावरील निष्ठा आणि प्रेम शेवटपर्यंत अखंडपणे जपले. त्यांची ज्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी ते कुटुंबासह त्या गावात राहिले. गावाशी एकरूप झाले. बापूजींच्या कार्याला वाहून घेऊन ते बापूजीमय झाले. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार होते. परमेश्वरावर अत्यंतिक श्रद्धा , पाप भिरू वृत्ती व सर्वांचे कल्याण करणारे असे त्यांचे सात्विक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी लिहिलेले पुस्तक हे त्यांच्या आयुष्याची कथा म्हणजेच एक अमृतपेशाची साफल्य गाथा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन प्रतिमापूजन तसेच संस्था प्रार्थना आणि भजनाने झाली. प्रास्ताविक व स्वागत श्री गिरीश गायकवाड यांनी केले. पुस्तकाबाबत मनोगत प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच मा. प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ, मा प्राचार्य आर के भोसले , ॲड केंजळे साहेब व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सी.ई.ओ मा कौस्तुभ गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार श्री उन्मेश गायकवाड यांनी मांनले तर सूत्रसंचालन डॉ. राजाराम कांबळे यांनी केले.
तसेच मृदंगाचार्य श्री मदन कदम व ह भ प किरण भोसले यांनी भजन सादर केले.याप्रसंगी पुस्तकाचे मुद्रक श्री ऋषिकेश सारडा मुखपृष्ठ चित्रकार श्री आकाश काशीद व कै. आप्पांचे रांगोळीतून व्यक्तिचित्र साकारणारे चित्रकार श्री.विजय शिंगण यांचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी डॉ बाबुराव गुरव, मा प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, मा मुरलीधर गावडे , मा प्राचार्य एस.के कुंभार तसेच शैक्षणिक , सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.