सातारा प्रतिनिधी | रविवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील साकल पूल अचानक कोसळला. यामध्ये जीवितहानी तर झालीच शिवाय काही पर्यटक नदीत वाहून गेले. या घटनेनंतर जिल्ह्यातील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील तसेच गावांना जोडणाऱ्या साकव पुलांच्या सुरक्षेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गावरील तब्बल ३२ पुलांची पाहणी सार्वजनिक विभागाकडून करण्यात आली असली जिल्ह्यात कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांतील अनेक साकव पुलांची अवस्था गंभीर बनली आहे. काही पुलानंतर शंभर वर्ष देखील झाले आहेत तरीही या पुलावरून वाहतूक केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई, कराड, पाटण अशा तालुक्यात ब्रिटिश कालीन पुलांची उभारणी करण्यात आली आहे. यातील बहुतांश पूल हे नद्यांवर असून, त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. हे पूल ऊन, वारा, अतिवृष्टी अन् अवजड वाहतुकीमुळे कमकुवत होऊ लागले आहेत. गावांना जोडणाऱ्या साकव पुलांची अवस्थाही काहीशी अशीच आहे.
दरवर्षी मान्सून सुरु होण्या पूर्वी जिल्ह्यातील जुन्या अशा पुलांची पाहणी केली जाते. कारण नद्या, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर अनेक लहान-मोठे पूल पाण्याखाली जातात. बऱ्याचदा पुलांचा काही भाग वाहून जातो, दगड सैल होतात. त्यामुळे बांधकाम विभागाकडून पाहणी करीत पुलांची तपासणी केली जाते. यावर्षी देखील ३० मीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या पूर्व, पश्चिम भागातील ३२ पुलांची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.
पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणारा नीरा नदीवरील सारोळा पूल गेली अनेक वर्षेत चर्चेत आहे. कारण या पुलावरून वाहन मार्गस्थ झाल्यानंतर बसणाऱ्या हादऱ्यांनी प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. या पुलावर आजवर अनेक अपघात तसेच आत्महत्येचे प्रकारही घडले आहेत.
गंभीर अवस्था तरीही पुलावरून वाहतूक
संगममाहुली येथे कृष्णा नदीवर असलेला कृष्णा पूल, वडूथ-आरळे व वाढे येथील दोन ब्रिटिशकालीन पूल, मेढा-महाबळेश्वर मार्गावर वेण्णा नदीवरील पूल, सातारा येथे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाढे हद्दीत असलेला जुना पूल, यांसह कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांतील अनेक साकव पुलांची अवस्था गंभीर आहे. तरीही या पुलावरील वाहतूक अखंड सुरू आहे.