‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून साताऱ्यात ‘परिवर्तनवादी’च्या महिलांकडून निषेध; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील परिवर्तनवादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांकडून ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ अशा आशयाची एक चळवळ राबविली जात आहे. या संघटनेच्या महिलांनी काल साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहरातून रॅली काढून मणिपूर येथील घटनेचा निषेधही व्यक्त केला.

पुराण काळात ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण करत महिलेची विटंबना केली गेली. त्याचप्रमाणे आजही आपल्या देशात महिलांची विटंबना होत आहे. आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान असतानाही महिलांच्या अब्रूची लक्तरे तोडली जात आहेत. मणिपूरमध्ये घटना घडल्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सत्ताधारी त्या विरोधात काहीही बोलत नाहीत. याचा निषेध आणि जनजागृती म्हणून ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ अशा आशयाची चळवळ तथा निषेध आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.

मणिपूर घटनेचा निषेध म्हणून महिलावरील अत्याचार दर्शविणारी चित्रे रेखाटलेलया साड्या नेसून मंगळवारी स्वातंत्र्यदिनी मणिपूर घटनेच्या निषेधार्थ चळवळ राबविण्यात आली. नवसर्जन ट्रस्ट, दलित फाउंडेशनसह देशभरातील अनेक सामाजिक व परिवर्तनवादी संघटनांनी या आंदोलनात पुढाकार घेतला आहे. नवसर्जन ट्रस्टचे मार्टिन मकवान यांची मूळ कल्पना असलेली ही निषेध मोहीम दलित फाऊंडेशनचे संचालक प्रदीप मोरे व सहकाऱ्यांनी देशभर राबवायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रपतींना पाठवली साडी

या निषेध आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महिला राज्यपाल, महिला सांसद, महिला आमदार, चळवळीतील महिला पत्रकार आणि परिवर्तनवादी संघटनांमधील महिलांना ‘द्रौपदी से द्रौपदी तक’, अशा आशयाचे लिखान आणि महिला अत्याचाराची चित्रे रेखाटलेल्या साड्या पाठविण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यदिनी त्या साड्या नेसून मणिपूर घटनेचा निषेध नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते, अशी माहिती सलमा मोरे-कुलकर्णी यांनी दिली.

आम्ही गप्प बसणार नाही

महिलांची भर रस्त्यात अशी विटंबना होत असताना आम्ही गप्प बसणार नाही. हा देश गप्प बसणार नाही, असा संदेश या आंदोलनातून साताऱ्यातील परिवर्तनवादी चळवळीतील राष्ट्रीयता जागर अभियानाच्या कार्यकर्त्या सलमा मोरे-कुलकर्णी यांनी केंद्रातील सरकारला दिला आहे. मणिपूरच्या घटनेत एका महिलेच्या विटंबनेचा जल्लोष करण्यात आला. तरी देखील देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती काही बोलत नाही, ही बाब खूपच लाजीरवाणी असल्याचे त्या म्हणाल्या.