समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे – पृथ्वीराज चव्हाण

0
20
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । “ज्या देशात महिलांचा अर्थव्यवस्थेत वाटा राहील त्याचवेळी तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे. महिला सक्षमीकरण हा शासनासाठी महत्वाचा मुद्दा असला पाहिजे. यासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिले महिला धोरण मांडले. त्यानंतर २००१ साली स्व. विलासराव देशमुख यांनी दुसरे महिला धोरण मांडले व त्यानंतर तिसरे महिला धोरण २०१४ साली मी मुख्यमंत्री असताना मांडण्यात आले.” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकताच महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. मानसी दिवेकर या व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच माजी पं. स. सदस्य नामदेवराव पाटील, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा गीतांजली थोरात, वारुंजीच्या सरपंच अमृता पाटील, सत्यजित ग्रुप च्या संचालिका भाग्यश्री पाटील, प्रा. धनाजी काटकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण आदीसह कराड दक्षिण मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महिला सक्षमीकरण हा शासनासाठी महत्वाचा मुद्दा असला पाहिजे. यासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिले महिला धोरण मांडले. या धोरणांमुळे उद्दिष्टे जरी मांडली जात असली तरी त्याचे ग्रामपंचायत पर्यंत अंमलबजावणी होते का? तसेच आज खरंच महिलांना समानतेची वागणूक दिली जात आहे का? घरातील सर्व कामे न चुकता करणारी गृहिणी तिच्या कामाचे मूल्य तिला कधी मिळणार आहे का ? असे अनेक प्रश्न महिला सबलीकरणात येतात. महिलांना 33% आरक्षण स्व. राजीव गांधींनी केंद्रीय पातळीवर लागू केले व त्यानंतर महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच महिलांना ५०% आरक्षण माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दिले गेले.

हे जरी असले तरी त्यासाठी अधिकार नक्की काय आहेत ते प्रशिक्षण महिलांना दिल्याशिवाय समजणार नाही. १८ व्या शतकात स्त्री शिक्षणाची बीज पेरणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिला सक्षमीकरणासाठीचे पहिले पाऊल होते. यावेळी व्याख्यात्या प्रा. मानसी दिवेकर यांनी महिलांना स्वावलंबी बनण्याचे मार्गदर्शन केले तसेच महिलांचे जीवन किती संघर्षमय असते ते कवितेतून सादर केले. यावेळी विदयाताई थोरवडे, नामदेवराव पाटील, अल्पनाताई यादव आदींची आपली मनोगते व्यक्त केली.