कराड तालुक्यातील ‘या’ उड्डाणपुलासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली थेट गडकरींकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल आहे. या ठिकाणी सेगमेंटल उड्डाण पूल होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या ठिकाणी पुल उभारावा, अशी आग्रहाची मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, उंब्रज हे कराड तालुक्यातील वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ असून एक विकसित गाव आहे. या गावाची लोकसंख्या २५ हजारच्या आसपास आहे. तसेच आसपासच्या ७० ते ८० गावांच्या मध्यवर्ती असलेले हे गाव आहे. उंब्रज येथे मुख्य बाजारपेठ असून विविध सोयी सुविधा या गावात आहेत. या गावातून राष्ट्रीय महामार्ग गेला असून सद्या भराव पूल येथे आहे. हा भराव पूल गावाच्या मधोमध झाल्याने गावाचे दोन भाग झाले आहेत.

यामुळे येथील बाजारपेठेचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच याच रस्त्यावर असलेला बस स्थानक वापरा अभावी पडून आहे. येथील नागरिक बस साठी राष्ट्रीय महामार्गावर उभा राहतात त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत तसेच भराव पुलाखालील व आसपास वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी भेट घेत उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्गावरील जुना भराव पूल काढून त्याठिकाणी नवीन सेगमेंटल उड्डाण पूल उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार या उड्डाण पुलाचे महत्व लक्षात घेता आपल्याकडे काम संदर्भार मागणी करीत असल्याचे पत्रात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हंटले आहे.