आगामी पंचवीस वर्षे तरी अजित पवारांना पर्याय नाही – नितीन पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने खासदार नितीन पाटील यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारणात दिशा चुकवू नका. दिशा चुकली की राजकारणाला फुलस्टॉप लागतो. अडचणी असतील तरी आपण बसून मार्ग काढू. परंतु, आता दिलेला शब्द काही झाले तरी पाळणारे एकमेव नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आगामी २५ वर्षे तरी त्यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीन पाटील यांनी केले.

कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव बाजार समितीचे सभापती ॲड. पांडुरंग भोसले, किसनवीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी उपाध्यक्ष अरविंद कदम, कोरेगावचे माजी सभापती संजय झंवर, राजाभाऊ जगदाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँगेसच्या स्थापनेवेळी शंकरराव जगताप यांची दिशा चुकली, नंतर शालिनीताई पाटील यांची दिशा चुकली. त्यांचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. पुढे शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व लाभले. मला मिळालेली खासदारकी ही सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुतीने वाढवण्यासाठी मिळालेली आहे. त्यासाठी माझे सर्व ते प्रयत्न राहतील. माझी जन्मभूमी जरी वाई असली तरी कर्मभूमी ही कोरेगाव आहे. माझ्या आजच्या खासदारकीत कोरेगावकरांचे मोठे योगदान आहे. मला खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून कोरेगावने घडवले आहे. लक्ष्मणराव पाटील (तात्या) तुमच्या पाठीशी ज्या पद्धतीने उभे राहत असत, त्याच पद्धतीने आम्ही दोघे भाऊ आ मकरंद पाटील तुमच्या पाठीशी उभे राहू. मिळालेल्या खासदार पदाच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मी तुम्हाला देण्याचा शब्द देतो.

किसन वीर साखर कारखाना हा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पूर्णतः कर्जबाजारी करून त्याचे वाटोळे करून ठेवले होते. अशा कारखान्यात लक्ष घालायचे नाही असे आम्ही ठरवलेले होते. मात्र, दुसऱ्या बाजूने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर बनत होता. अखेर शरद पवार, अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना एकूण स्थिती सांगितली. त्यांनी होकार दिल्याने सर्वांना बरोबर घेऊन कारखाना ताब्यात घेतला. अडचणी खूप होत्या. ३० कोटी भांडवल उभे केले. कारखाना चालवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर दुर्दैवाने महाविकास आघाडीचे तथा उद्धव ठाकरे सरकार पडले. अखेर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ताबदल केला.