NDRF च्या जवानांनी कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती काळात नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या? अशा वेळी बचावकार्य करून एखाद्याचा जीव कसा वाचवायचा? या सर्व गोष्टींची माहिती व प्रात्यक्षिक आज NDRF टीमच्या जवानांकडून कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कराड तहसील कार्यालय व वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन विषयावर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य एल. जी. जाधव, NDRF टीमचे निरीक्षक राहुल रघुवंशी, एस. ई. ढोकरे, निलेश जाधव, प्रवीण निकम, अभिजीत खुसपे याची प्रमुख उपस्थिती होती.

कराड व पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोयना-कृष्णा नदीला पूर येतो. तसेच पाटण तालुक्यातील काही दुर्गम भागात भूतस्खलन होऊन जीवितहानी व घरांची पडझड होते. अशावेळी NDRF टीमच्या जवानांकडून बचावकार्य राबविले जाते. या आपत्ती व्यवस्थापनेबाबत माहिती देण्यासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आज एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी NDRF टीमचे निरीक्षक राहुल रघुवंशी, एस. ई. ढोकरे, निलेश जाधव, प्रवीण निकम, अभिजीत खुसपे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करून त्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी NDRF टीम जवान निलेश जाधव म्हणाले की, एनडीआरएफ ही यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हे पथक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करते. भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी या दलाला पाचारण करण्यात येते. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवली तर त्यावेळेस तातडीने जीव वाचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते.