सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यावतीने शनिवार 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी २२ मार्चच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे असल्यास संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे.
लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरूपी वाद मिटू शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही. हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही, वेळ व पैशाची बचत होते. लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. व्ही. आर. जोशी यांनी केले आहे.