सातारा प्रतिनिधी | मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील व महत्वाच्या मार्गावरील पुलांच्या परिस्थितीकडे दिले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यांची खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, मुरुड येथे तारळी नदीवर सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेला लोखंडी साकव पूल अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आला आहे.
चाळीस वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या या पुलावरील लाकडी फळ्या पूर्णतः मोडकळीस आल्या आहेत. अनेक फळ्या तुटल्या आहेत. त्यामुळे दोन फळ्यांमधील सापटीतून नदीपात्रात पडण्याचा धोका निर्माण झाला होता. याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, प्रशासनाला त्याची माहिती मिळताच मंडलाधिकारी किशोर वाडकर यांनी जागेवर जाऊन पाहणी करून पूल वाहतुकीस पूर्ण बंद केला. यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना दोन किलोमीटरचा वळसा घालून मुरुडला जावे लागणार आहे. यावेळी पोलिस कर्मचारी, मुरुड व तोंडोशी गावचे ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, पोलिस पाटील, महसूल सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
तारळे विभागातील मुरुड हा छोटासा भाग व छोटी बाजारपेठ आहे. तारळी धरणापूर्वी याचा विस्तार बऱ्यापैकी होता. गावात बाजार भरायचा, महाराष्ट्र बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, टपाल कार्यालय, विद्यालय, सर्व प्रकारची दुकाने आदी याठिकाणी होती. मात्र, धरणानंतर परिसरातील आठ गावांचे विस्थापन झाले आणि हळूहळू लोकांचा राबता कमी झाल्याने बाजारपेठेवरही परिणाम झाला; पण अजूनही ती टिकून आहे. तोंडोशी हे शेजारील गाव. तिथून मुरुडला पायी ये-जा करण्यासाठी एक लोखंडी साकव पूल उभारला गेला होता. त्यावरून लोकांची ये-जा होत होती. ग्रामस्थ महिला, पुरुष, विद्यार्थी त्याचा वापर करीत होते.