कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणाची विकेट घ्यायची, हे शरद पवारच ठरवतील; आमदार शिंदेंचा यॉर्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणाची विकेट घ्यायची, हे आयपीएलचे जनक असलेले खासदार शरद पवारच ठरवतील, असे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे. दरम्यान, कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीसांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणविसांवर त्यांनी केली.

शरद पवारांनीच आयपीएल आणली

कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी खा. उदयनराजेंना आयपीएलच्या संघाचे मालक म्हटले होते, त्याबाबत छेडले असता खासदार शरद पवार यांनीच देशात आयपीएल आणली आहे. त्यामुळे कोणता संघ खेळेल, कोणता खेळाडू पुढे येईल. हे तेच ठरवतील, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.

फक्त बाळासाहेबांनीच धाडस दाखवले

बाबरी मशीद पाडली, त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हते. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवले. शिवसेनेने बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घेऊन शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. आज मात्र सर्वजण याचे श्रेय घेत आहेत असून कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीसांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी असल्याचा टोला आमदार शशिकांत शिंदेंनी लगावला.

आरक्षणाचा प्रश्न किती दिवसात मार्गी लावणार?

आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भुमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार केला पाहिजे. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल. सरकारने समाजात तेढ वाढू नये, यासाठी प्रयत्न करावे. मुंबईला आंदोलनकर्ते आले तर मुंबई ठप्प होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

… तर देशात इतिहास घडेल

आमदार शिंदे म्हणाले, देशाची निवडणूक लोकांनी हातात घेतली तर इतिहास घडेल. अन्यथा पुढील निवडणुक कधी होईल हेही सांगता येणार नाही. भाजपाने इतर पक्षातील मातब्बर नेते पक्षात घेतले. तरीही विरोधकांच्या घरी ईडीच्या धाडी पडत आहेत. हीच का तुमची लोकप्रियता, असा सवालही आ. शिंदेंनी केला.

श्रीरामाला धर्मात वाटू नका

देवाला धर्मात वाटू नका. प्रभू श्रीराम कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. देवाला धर्मात वाटून अयोध्येतील मंदीर प्राणप्रतिष्ठापनेचा राजकीय इव्हेंट हाेवू नये. अयोध्येचे मंदिर खूप वर्षांनंतर होत असून त्याचा आनंद आम्हा सर्वांनाच असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.