सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा आणि परिसर हा सिनेमा, मालिकांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत पोषक असून त्यासाठी धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज साताऱ्यात केली.
साताऱ्यात आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार आज सातारा दौऱ्यावेळी आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 11 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच जिल्हा पदाधिकारी आणि सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री शेलार यांनी म्हणाले की, सातारा परिसर हा ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांसह निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. या भागात सिनेमा, मालिका यांचे चित्रिकरण सध्या केले जाते. भविष्यात या परिसराला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, चित्रपट, मालिका क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांना अधिक सुविधा कशा देता येतील, याबाबत एक धोरण तयार करण्यात येईल. संबंधित व्यवसायातील तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन शासन याबाबत धोरण तयार करेल, अशी घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली.
यावेळी आमदार आणि सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी सभापती सुनिल काटकर, माजी आमदार मदन भोसले, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने- कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट उपाध्यक्ष पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.
राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बेईमानी उद्धव ठाकरेनी केली : शेलार
सर्वात जास्त मुंबईतील झाडांची कत्तल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असताना झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बेईमानी उद्धवजी ठाकरे यांनी केली. संजय राऊत त्याचे मूळ आहेत. आपल्या विषयाच्या आग्रहासाठी एखाद्या मंत्र्यांवर दोषारोप करणं हे कितपत योग्य आहे? असा सवाल करत मंत्री शेलार यांनी सबका साथ सबका विकासमध्ये भाजप मजबूत झाली तर महायुती मजबूत होणार आणि महायुतीला बरोबर घेऊनच भाजप चालणार हे गणित स्पष्ट असल्याचे म्हंटले.
साताऱ्यातील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला…
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील सरकारला सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मूलमंत्र जपत ११ वर्षे पूर्ण झाली असून, या काळात देशाने अनेक अभूतपूर्व बदलांचा अनुभव घेतला. या पार्श्वभूमीवर आज सातारा दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “विश्वास – नेतृत्व – विकास” या त्रिसूत्रीवर आधारित कामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यापक संवाद साधावा याबाबत उपस्थितांशी चर्चा केली.