कोरोनात घरात बसून दिवस काढले, तसेच आताही काढावे लागतील; माधव भंडारी यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘केंद्रीय अर्थसंकल्पात मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच न लागल्याने त्यांनी शेरेबाजी सुरू केली आहे. पण, याला भाजपने चोख उत्तर दिल्याने विरोधकांचे अर्थसंकल्पाविषयीचे अज्ञान उघड पडले आहे. कोरोनात घरात बसून दिवस काढले. तसेच आताही काढावे लागतील, असा इशाराही ठाकरे यांना भंडारी यांनी दिला आहे.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. भंडारी म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सर्वांच्या गरजा, अपेक्षा लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. यातून महाराष्ट्राला भरघोस तरतूद झालेली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकासासाठी ४०० कोटी दिले आहेत. महाराष्ट्र-गुजरात-मध्यप्रदेश- हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-दिल्ली आैद्योगिक काॅरिडाॅरसाठी ४९९ कोटी तर बंगळूरू-मुंबई काॅरिडाॅरसाठी ४६६ कोटींची तरतूद आहे.

उध्दव ठाकरे यांनी जे वक्तव्य केल आहे. ते त्यांनी वैफल्य आणि नैराश्येतून केले आहे. महाराष्ट्रातील जनता एकेरी भाषा सहन करत नाही. शिशुपालने श्रीकृष्णालाही असेच सांगितले होते. यामध्ये पुढे काय झाले सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कोरोनात जसे घरात बसून दिवस काढले. तसेच यापुढे दिवस काढावे लागतील, असा इशारा भंडारी यांनी यावेळी दिला.