सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील रेशनिंग कार्डधारकांना ई केवायसी बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया सर्व खातेदारांनी 30 जूनपर्यंत पूर्ण करावी अन्यथा त्यांचे रेशनिंग कार्ड रद्द केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात अद्याप तीन लाख 61 हजार 209 जणांचे ई- केवायसी बाकी आहे. त्यांना स्मरणपत्रे पाठवण्यात आली आहे. तर 36 हजार 483 जणांचे आधार कार्ड, रेशन कार्डावरील नाव न जुळल्याने त्यांची केवायसी नाकारण्यात आली आहे
जिल्हा पुरवठा विभाग बायोमेट्रिक प्रणाली, पॉज मशीन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक होत आहे. अन्नपुरवठा प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 17 लाख 92 हजार 84 शिधापत्रिका आहेत. त्यापैकी एक लाख 49 हजार 365 जणांची केवायसी मंजूर झाले आहे. 36 हजार 483 जणांचे आधार कार्ड व रेशन कार्डावरील नावे जुळली नाहीत तर चार लाख 81 हजार 510 केवायसी मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
ही प्रलंबित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत जिल्ह्यात तीन लाख 61 हजार 209 लाभार्थी म्हणजे तब्बल 20 टक्के केवायसी अद्याप बाकी आहे. शासनाने गेल्या आठ महिन्यापासून रेशन कार्डसाठी केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेवटची मुदतवाढ 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे. ज्या रेशन दुकानदारांकडे लाभार्थ्यांची केवायसी कमी प्रमाणात झाली आहे.
त्या दुकानदारांनी लाभार्थ्यांची वैयक्तिक संपर्क साधून त्यांना ई केवायसीसाठी तयार करावे आणि ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत. पुरवठा विभागाकडून जिल्ह्यामध्ये 100 टक्के ईकेवायसी करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पुरवठा विभागाने सर्व तहसील कार्यालयांना दोन महिन्यापूर्वी पत्र पाठवून या प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन लाख 61 हजार दोनशे नऊ जणांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही. अद्यापही या रेशनिंग कार्ड धारकांकडे वीस दिवस बाकी आहेत, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.