सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या जलाशयाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलसागर’ असे नाव देण्यासाठी प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत जलाशय परिसराचे सुशोभिकरण, पर्यटन विकास, तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. कोयना परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त व्हावे आणि स्थानिक भागाचा विकास व्हावा, यासाठी या उपक्रमाला गती देण्यात येणार आहे. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ग्रामविकास मंत्री, जलसंपदा विभाग अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदींची उपस्थिती होती.
मंत्री विखे- पाटील म्हणाले, “कोयना प्रकल्प राज्याच्या उर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा असून या जलाशयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केल्यास जनतेच्या भावना अधिक दृढ होतील.” त्यांनी संबंधित विभागांना प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले.
बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कोयनानगर परिसरातील मूलभूत सुविधा, तसेच प्रदूषण नियंत्रण आणि जलस्रोत संवर्धन यासंबंधी सूचनांची नोंद घेण्यात आली. जयकुमार गोरे यांनी स्थानिकांच्या मागण्या मांडल्या. परिसरात पर्यटन विकासासाठी लागणाऱ्या सुविधा उभारण्याची गरज शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली. येत्या काळात संपूर्ण अंमलबजावणी आराखडा, समन्वय समितीची निर्मिती आणि स्थल निरीक्षणाची योजना ठरवण्यात आली.