सातारा प्रतिनिधी | दरवर्षीपेक्षा यंदा पावसाने मी महिन्यातच सुरुवात केली आहे. मे महिन्यात वळीवाचा तर आता मान्सून स्वरूपाचा सुरु झालेला पाऊस जून महिना संपत आला तरीही पडू लागला असल्याने शेतीच्या मशागती आणि पेरण्या रखडल्या आहेत. तर काही शेतकरी दुबार पेरणीच संकट तर येणार नाही ना या भीतीने हळूहळू पावसाचा अंदाज घेत पेरण्या करत आहेत. पाऊस उघडीपच देत नसल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कर्ज काढले आहे, पण सततच्या पावसामुळे पेरणी लांबणीवर पडल्याने मोठे आर्थिक संकट त्यांच्यासमोर उभे आहे. सततच्या पावसामुळे आणि पेरणीतील अडचणींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या पाऊस पडला असला तरीही सातारा जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १४ हजार हेक्टरवर पेरणी झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात केवळ चार ते पाच टक्केच पेरण्या झाल्याचे त्यावरून स्पष्ट होत असून अनेक तालुक्याच्या ठिकाणी शेतीच्या मशागतीही होणे बाकी आहे. पावसाच्या पाण्यावर पिके तरारून येत असल्याने त्याद्वारे शेतकऱ्यांना चार चांगले पैसेही मिळतात. दर वर्षी शेतकरी साधारणतः मे महिन्याच्या १५ तारखेनंतर शेतीच्या मशागतीस सुरुवात करून शेतजमिनी पेरणीसाठी तयार करून खरिपातील पेरणीच्या तयारीला लागतात.
खरिपातील पेरणीसाठी दरवर्षी शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पहात असतात. यंदा मात्र उलट स्थिती झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस हा जून महिन्याच्या २१ तारखेनंतरही सातत्याने बरसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीही रखडल्या आहेत.
अजून आठवडाभर उघडीप दिली तरच पेरणी होईल अशी जिल्ह्यात स्थिती निर्माण झाली आहे. मात्र पाऊस उघडीप घेईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा खरिपातील पिकांची पेरणी होणार की नाही या चिंतेत बळीराजा आहे.
दरवर्षी होतेय ‘या’ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन
सातारा जिल्हा हा खरिपाचा जिल्हा असल्याने जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग, मका, ज्वारी, मुग, नाचणी, तूर, उडीद, इतर कडधान्य आणि उसासह अन्य पालेभाज्या, भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणात करतात.
पिकांचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी
ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके आणि केळी, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, गवारी, कारले, दोडका आदी पिके घेतली होती त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड आली आहे. ऐन तोडणीस आलेली पिके पावसाच्या माऱ्याने वाया गेली आहेत. अनेक ठिकाणी त्या पिकांचे पंचनामे झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या पिकांचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.