कराड प्रतिनिधी | गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघाताची नुकतीच घटना घडली. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले. त्यांच्यासह २४२ प्रवाशांचा देखील मृत्यू झाला. अहमदाबाद विमानतळावरून ते लंडनला जात होते. या विमानात सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका कन्या व जावयाचा देखील मृत्यू झाल्याची गोष्ट समोर आली आहे.
मुलांना घरीच ठेवून अहमदाबादहून लंडनला निघालेल्या कल्याणी आणि गौरवकुमार ब्रह्मभट या दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. कराड हे कल्याणीचे माहेर होते. प्रकाश आणि ज्योती ढवळीकर यांची ती मुलगी होती. तिच्या अपघाती मृत्यूमुळे ढवळीकर कुटुंबासह कराडकरांनाही धक्का बसला आहे. मुलांना घरी ठेवल्यामुळे दोन्ही मुले सुदैवाने बचावली. कल्याणी आणि तिचा पती गौरवकुमार ब्रह्मभट हे दाम्पत्य एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी (12 जून) अहमदाबादहून लंडनला निघाले होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना घरीच ठेवले होते. त्यामुळे अपघातातून दोन्ही मुले बचावली. मात्र, दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच कराडच्या सोमवार पेठेवर शोककळा पसरली.
विमान अपघाताची माहिती मिळताच कल्याणीचे आई, वडील आणि भाऊ हे तातडीनं अहमदाबादला रवाना झालेत. त्या अपघातात कराडच्या विवाहित कन्येसह तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याची बातमी शुक्रवारी (13 जून) रात्री कराडकरांना समजल्यानंतर कराडकरांना धक्का बसला. दोन्ही मुलांना घरी सासू-सासऱ्याकडे ठेवून कल्याणी आणि गौरवकुमार ब्रह्मभट हे दोघे विमानाने लंडनला निघाले होते. त्यांचा मुलगा दहावीत तर मुलगी इयत्ता सहावीत आहे. आपल्या मुलीसह जावयाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर ढवळीकर आणि ब्रह्मभट कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.