साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार; पत्रकारांना उध्दट उत्तरे दिल्याने निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे काल जिल्हा शासकीय क्रांतीसिह नाना पाटील रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेवेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यात व प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधींच्यामध्ये वादावादीचे घटना घडली. शंभूराजे देसाई यांनी शुक्रवारी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीच हुज्जत घातली. प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही असे उत्तर दिले. त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधील नसतील तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून याला सर्व संघटनांनाचाही पाठिंबा आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे राज्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर,जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघ अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, राज्य महिला सरचिटणीस विद्या म्हासूर्णेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक राहुल तपासे, समन्वयक शंकर मोहिते, डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर,तुषार भद्रे, मराठी पत्रकार परिषद सलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद, 11 तालुक्यांचे पत्रकार संघ यांनी हा निर्णय जाहीर केला.

मंत्री शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पत्रकार परिषदांमध्ये आपल्याला जे आवश्यक आहे तेवढीच माहिती देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून हे योग्य नसल्याचेही त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. कोणत्याही पत्रकार परिषदेला वेळेवर न पोहचणे, पत्रकारांना वाट पहात थांबविणे, पत्रकार परिषदेच्या वेळांमध्ये सतत बदल करणे असे त्यांचे प्रकार सुरुच आहेत.

पत्रकारांशी बोलताना देखील मंत्री देसाई यांच्याकडून ‘आपल्याला माहिती नाही. माहिती घ्या आणि बोला. अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलू नका, असा प्रतिप्रश्न कायम केला जातो. मुळात त्यांनाच अनेक प्रश्नांची माहिती नसते. त्यांची माहितीच अपुरी असल्यामुळे त्यांना उत्तर देता येत नाही. पण, त्यासाठी पत्रकारांच्या माहितीबाबत सतत बोलल्यामुळे सर्व पत्रकारांचा कायम अपमान होत आहे. यामुळे आता त्यांच्या कोणत्याही पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.