शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी जावळीतील पत्रकार करणार 15 ऑगस्टला धरणे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र व सहाय्यक उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओबळे यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला अद्याप राज्यसरकारकडुन निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जावळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी 15 ऑगस्टला मेढ्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जावळी तहसिलदारांना नुकताच निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट आपण साजरा करीत आहोत. ही फार आनंदाची गोष्ट आहे. मात्र, जावली तालुक्यातील केडंबे या गावचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांनी राष्ट्राला सर्वोच्च बलिदान देत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणला. याच जावलीच्या भुमीपुत्राचा मरणोत्तर भव्य-दिव्य स्मारक उभारण्याचा मनोदय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2013 मध्ये मंत्रालयीन बैठकीत व्यक्त करून स्मारक उभारण्याच्या संदर्भातील सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, स्मारकाच्या जागेचा प्रश्न गेली 10 वर्षे रखडत पडला होता. मात्र, तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला तब्बल 10 वर्षे लागली ही बाब खेदजनक आहे.

शहिद तुकाराम ओंबळे यांच्या केडंबे या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारण्याकरीता सरकारकडुन लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन स्मारकाचा रखडलेला प्रश्न आपण मार्गी लावावा, अशी मागणी पत्रकार संघ करीत आहे. स्वतंत्र भारताचा स्वतंत्र दिन साजरा करीत असताना जावली तालुक्याच्या शहीद तुकाराम ओंबळे यांचे बलिदान व्यर्थ न घालवता महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करावा, याकरीता 15 ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार संघाचे सदस्य जावळी तालुक्याच्या सुपुत्रासाठी धरणे आंदोलनास बसणार आहेत. लोकशाहीत आपण आमच्या मागण्यांचा सार्वभौम विचार करुन अशोकचक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळेंच्या जन्म गावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या निधीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती ही पत्रकारांनी निवेदनात केली आहे.