मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती नियंत्रणाबाबत महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । येत्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून या काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून निषेध घाबरदारी घेणे आवश्यक असते. त्यास दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुणे येथे पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती पूर्व आणि मान्सून पूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवावी, आपत्कालीन परिस्थितीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावे. तसेच सर्व विभागांनी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत, अशा सूचना केल्या.

पुणे येथे पार पडलेल्या विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा बैठकीस विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. तर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत विभाग प्रमुख, समन्वयाची जबाबदारी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. यावर्षी हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्व विभागांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज असले पाहिजे. सर्व विभागांनी आपले नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत. त्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची देवाण घेवाण करावी.

या’ केल्या महत्वाच्या सूचना

अतिवृष्टीमुळे अलमट्टी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाने आंतरराज्यीय समन्वय राखावा. पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन करावे, पाण्याचा विसर्ग वाढविण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना द्यावी. धरणभिंती, कालवे संरचनांची तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करावी. शहरातील नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत. अवैध जाहिरात फलक हटविण्यासह मान्यता असलेल्या जाहिरात फलकांची संरचनात्मक स्थिरता तपासून धोकादायक फलक हटवावेत. धोकादायक वाड्यांतील नागरिकांचे स्थलांतर करावे, आदी सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी केल्या.

‘या’ महत्वाच्या विभागांकडून उपाययोजनांचा आढावा…

पुणे येथे बैठकीवेळी डॉ. पुलकुंडवार यांनी या बैठकीत धरणे, नदी निहाय संभाव्य पूरप्रवण गावे, रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची प्रमुख ठिकाणे, पूरपरिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या सर्व उपाययोजना, नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था (शेल्टर्स), पशुधनाची काळजी, आरोग्य विभागामार्फत करावयाच्या उपाययोजना. रेल्वे विभाग, एनडीआरएफ, विद्युत विभाग, कृषी विभाग, सहकार विभाग, हवामान विभाग, जिल्हा परिषद तसेच पोलिस विभागाने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा संबंधितांकडून घेतला.