देवदास मुळे यांना शासनाचा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

0
22
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली यात 2021 सालचा राज्यस्तर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार ‘दैनिक तरुण भारत संवाद’चे कराड कार्यालय प्रमुख देवदास प्रल्हाद मुळे यांना नुकताच जाहीर झाला आहे.

रोख 51 हजार रुपये, प्रशस्तीपत्र व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हा राज्यस्तरीय आहे. या पुरस्कारासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेतून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे एका वर्षातील लिखाणाचे प्रस्ताव मागवण्यात येतात. या प्रस्तावांमधून एका प्रस्तावाची निवड करण्यात येते. २०२१ या वर्षात कोरोना महामारीचे संकट होते. त्यावेळी स्वच्छता मोहिमेसही महत्व होते. त्या वर्षात स्वच्छता विषयक केलेल्या लिखाणाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

देवदास मुळे यांनी २०१८ सालापासून कराड नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील उपक्रमांना प्रसिद्धी देऊन कराडकर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी योगदान दिले आहे. कराड नगरपालिकेच्या अभ्यास दौऱ्यातून देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर इंदूर (मध्य प्रदेश), अंबिकापूर (छत्तीसगड) लोणावळा आदी शहरांना भेटी देऊन त्याविषयी लिखाण केले आहे. कराड नगरपालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी पालिका प्रशासनाला मदत केली आहे. कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे, रमाकांत डाके, तत्कालीन आरोग्य समिती सभापती विजय वाटेगावकर, तत्कालीन नगर अभियंता एम. एच. पाटील, ए. आर. पवार, रफिक भालदार यांचे मार्गदर्शन लाभले.

स्वच्छता व पर्यावरण विषयक लिखाणातून माझे कार्य यापुढेही सुरू ठेवणार : देवदास मुळे

‘स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राज्यातील पालिका, महानगरपालिका असलेल्या शहरांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृतीबाबत अनेक उपक्रम, मोहीम राबविण्याचे काम केले गेले. त्यामध्ये कराड नगरपालिकेने देखील कराड शहरात स्वच्छतेचे उत्तम काम केले. यासाठी पालिका अधिकारी, स्वच्छता कर्मचारी यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांनी स्वच्छतेबाबत केलेली कामे वृत्तांकनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. लोकांमध्ये वृत्तपत्रातून केलेल्या लिखाणाने जनजागृती झाली. याची शासनाच्या वतीने दखल घेत मला आज स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार घोषित झाला. मी स्वच्छता व पर्यावरण विषयक लिखाणातून माझे कार्य यापुढेही सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकार देवदास मुळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.