‘कास’च्या मुख्य जल वाहिनीला गळती, साताऱ्याचा पाणीपुरवठा ‘इतके’ दिवस बंद राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कासाणी व आटाळी येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पालिकेकडून उद्या गुरुवार, दि. २३ रोजीपासून गळती काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी कास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कास ही सर्वात जुनी पाणीयोजना असून, या योजनेतून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. कासाणी व आटाळी या गावाजवळ सोमवारी मोठी गळती लागली असून,पाण्याचा अपव्यय सुरू झाला आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी ही गळती काढण्याबरोबरच सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे गुरुवारी कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा तसेच कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तर शुक्रवारी पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकीतून सकाळ सत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे