सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढ्या नाल्याना पाणी वाहत आहे. बांबू लागवडीसाठी जमीनही उत्तम झाली असून कृषि, सामाजिक वनीकरण विभागाने तातडीने बांबू वृक्षाची लागवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उप वन संरक्षक आदीती भारद्वाज, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कराड, पाटण खंडाळा, कोरेगाव, जावली या तालुक्यांमध्ये 46.30 हेक्टरवर 31 हजार 738 बांबू वृक्षाची लागवड करावयाची आहे. ही लागवड लवकरात लवकर पुर्ण करावी. जिल्ह्यातील ग्रामपंचायती मार्फत बांबू लागवड करावयाची आहे. या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या विभागांना दिलेले बांबू लागवडीचे उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.