जिह्यातील दुष्काळ मुक्तीसाठी उपमुख्यमंत्री फडणविसांनी घेतला धडाकेबाज निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील नव्याने समावेश होऊन सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांच्या योजनेसाठी सुप्रमा आणि सध्या सुरू असलेल्या या योजनेच्या कामांसाठी निधी घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

बैठकीला जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपले, दूरदृश्य प्रणालीद्वारे ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष लोकेश चंद्र, संचालक संजीव कुमार यांच्यासह जलसंपदा व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कलेढोण, मायणी, कुकुडवाडसह ४२ गावांना टेंभूचे पाणी देण्याच्या योजनेच्या कामांची वर्कऑर्डर आठ दिवसांत काढण्याचे आदेशही उपमुख्यंत्री फडणवीस दिले. औंध उपसा सिंचन योजनेत औंध, त्रिमली, नांदोशी, खबालवाडी, गणेशवाडी, खरशिंगे, गोपूज, वाकळवाडी, गोसाव्याचीवाडी, कुमठे, वरुड, जायगाव, अंभेरी, लांडेवाडी, कारंडेवाडी, गोपूज या १६ गावांचा समावेश आहे.

याच परिसरातील उर्वरित कोकराळे, लोणी, भोसरे, कुरोली आणि धकटवाडी या पाच गावांचा समावेश या योजनेत करण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठकीत निर्णय घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

माणच्या उत्तर भागातील ३२ गावांसाठीची आंधळी उपसा सिंचन योजना कामे पूर्णत्वाला जाऊन लवकरच कार्यान्वित होत आहे. या योजनेपासून वंचित उत्तर आणि पश्चिम माणमधील गावांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या गावांसाठीच्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

खटाव तालुक्यातील मायणी, कलेढोण आणि माण तालुक्यातील कुकुडवाडसह ४२ गावांना टेंभू योजनेचे पाणी देण्याच्या योजनेच्या कामांचे टेंडर निघाले आहे. या कामांची वर्कऑर्डर आठ दिवसांत काढण्याचे निर्देश मंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.