मोकाट रेड्यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांनी डागली ठाकरे-राऊतांवर टीकेची तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मुंबईत झालेल्या महा पत्रकार परिषदेचा उल्लेख टाळून कराडमधील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची योजना इथल्या कार्यक्रमात असेल तर सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे – राऊतांचा समाचार घेतला.

फडणवीसांची ठाकरे-राऊतांवर टोलेबाजी

कराड येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. नामोल्लेख टाळून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फडणवीसांनी मोकाट रेडे म्हटले. तसेच इथल्या कार्यक्रमात सर्वात उंच बैल, दोन टनाचा रेडा असं बरंच काही आहे. आमच्याकडे मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना या प्रदर्शनात आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला.

रणजी नव्हे ही आयपीएलची टीम

दुरावस्था झालेल्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला उर्जितावस्थेत आणून तुमच्या उपस्थितीत रणजीची पहिली मॅच व्हावी, असे खासदार उदयनराजे आपल्या भाषणात म्हणाले होते. तो धागा पकडून फडणवीस म्हणाले की, राजे ही रणजीची टीम नाही. आयपीएलची टीम आहे. त्याचे मालक पण तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही टीममध्ये आहातच. फक्त आम्हाला टीममध्ये ठेवा. फडणवीसांच्या या कोटीवर जोरदार हशा पिकला.

देवेंद्रजी उद्या राज्याचा कासरा तुम्हाला हाती घ्यायचाय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार उदयनराजे भोसले यांना बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. या अनुषंगाने उदयनराजे म्हणाले, देवेंद्रजी आज आपण हातात कासरा धरून बैलगाडी चालवली, परंतु उद्या तुम्हाला राज्याचा कासरा हाती घ्यायचा आहे. शिवाजी स्टेडियम ऊर्जितावस्थेत आणून पहिली रणजीची मॅच आपल्या उपस्थितीत व्हावी. फक्त आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या. रिझर्व्ह ठेऊ नका, अशी उदयनराजेंनी कोटी करताच फडणवीसांना हसू आवरले नाही.

सातारा पुर्वीसारखा कुणाचा बालेकिल्ला नाही

सातारा जिल्हा आता कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही, असे सांगत उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. समाजात काम करणाऱ्या लोकांकडे जनतेचे लक्ष असतं. त्यामुळे निवडणुकीत लोक महायुतीच्या बाजूने उभे राहतील. येत्या लोकसभा निवडणुकीत ४५ नव्हे तर सर्व ४८ जागा निवडून येतील, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

दुष्काळाचा कलंक पुसून टाकणार

कृष्णा-कोयनेवरील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. आमदार जयकुमार गोरेंनी हाती घेतलेल्या कामांमुळे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांवरील दुष्काळी हा शिक्का नक्की पुसला जाईल. सत्तेत असताना साखर उद्योगातील ज्या लोकांना निर्णय घेणे जमले नाही ते निर्णय मोदींनी घेतले, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका केली.