जिल्ह्यातील दुष्काळी प्रकल्पांसह म्हसवड-धुळदेव MIDC ला गती देणार : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात जे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध केला जाईल. तसेच माण तालुक्यातील म्हसवड-धुळदेव औद्योगिक वसाहतीच्या कामालाही गती देण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कराड येथील कृष्णा सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत व जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, रणजिसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात दुष्काळी भागात पाणी जाणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर इतर जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या कामांसाठीही शासन सकारात्मक आहे. टप्प्याटप्प्याने कामांना प्रशासकीय मान्यतेबरोबर निधीही उपलब्ध करून दिला जाईल.

बेंगलोर-मुंबई कॉरिडोअरवर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेवलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत म्हसवड-धुळदेव ता. माण येथे नव्याने औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. या वसाहतीच्या तांत्रिक बाबींना मंजुरी देण्यात येईल. या औद्योगिक वसाहतीला 3246.79 हेक्टर आर जमीन लागणार आहे. जी शासकीय जमीन आहे ती तात्काळ जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करावी. सातारा एमआयडीसी मध्ये सब स्टेशन उभारण्यासाठी महापारेषणने त्यांच्याकडील 35 गुंठे जागा ही महावितरणला हस्तांतरित करावी, अशा सूचना फडणवीसांनी दिल्या.

जिल्ह्यातील ‘ या ‘ प्रकलपांचा घेतला आढावा

यावेळी धोम-बलकवडी प्रकल्प, तारळी प्रकल्प, उरमोडी प्रकल्प, कुडाळी मध्यम प्रकल्प, वांग प्रकल्प, मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्प, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना, हणबरवाडी व धनगरवाडी उपसा सिंचन योजना या योजनेअंतर्गत व प्रकल्पातर्गत सुरू व प्रलंबित असलेल्या कामांचा सविस्तर आढावाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.