स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहीर, माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते होणार वितरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | यावर्षीचा मानाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टिमस जळगाव चे अध्यक्ष अशोक जैन यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप गोवा राज्य यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 50 व्या स्मृतीदिनानिमित्त 41 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी होत आहे. स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदीर उंडाळे येथे अधिवेशनात पुरस्काराचे वितरण होणार आहे. 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे.

अशोक जैन यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान असून जैन इरिगेशन च्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावर आधारित तुषार व ठिंबक सिंचन प्रणालीवर 45 पिकापेक्षा जास्त पिकावर उत्पादन तंत्र विकसित केले. या कृषी पध्द्तीमुळे 50 टक्के पाण्याची बचत झाली या बरोबर त्याचे समाजकार्य सुरू असून या एकंदरीत योगदानाबद्दल श्री जैन यांचा यावर्षीचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

सदर राष्ट्रीय कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, माजी सैनिक उपस्थित राहणार असून कराड तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीच्या विश्वस्तांनी केले.

1973 पासून ही परंपरा अखंड सुरू

माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य स्तरीय स्वातंत्र सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरू केले होते. 1973 पासून ही परंपरा अखंड सुरू आहे. उंडाळकर यांच्या पश्चात स्मारक समितीने अॅड. उदयसिंह पाटील याच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

आतापर्यंत अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव

स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये स्वातंत्र सेनानी माजी राजदूत एन.जी. गोरे, सुप्रसिध्द कवी ना. धो. महानोर, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती उषा मेहता, स्वा.से. गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निलमताई देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया, स्वा.से. व साहित्यिक जी.पी. प्रधान, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गरूड, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य पी.बी.पाटील, स्वा.सै. प्रभाकररावजी कुंटे, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, कृषीतज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, प्रसिध्द वकील अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, जे.जे. रूग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थशास्त्रज्ञ निळकंठ रथ, लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. प्रकाश आमटे, स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य, लेखक सुरेश व्दादशीवार, डॉ. विवेक सावंत, पद्मश्री डॉ. गणेश देवी, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा समावेश आहे.