शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; खरीप व रब्बी हंगामातील पीकस्पर्धा जाहीर

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सन २०२५-२६ साठी कृषी विभागामार्फत खरीप व रब्बी हंगामातील १६ पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मूग व उडीद पिकासाठी स्पर्धेत ३१ जुलै पर्यंत तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सहभाग घेता येणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप ११ व रब्बी हंगामातील ५ अशा एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांचा समावेश असून त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सहभाग घेता येईल.

पीक स्पर्धेतील विजेत्यांना तालुकापातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार तर राज्य पातळीवर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पीकस्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.