जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात आहे ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहेत. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती असून सर्वच तालुक्यांत पाणी टंचाई आहे. त्यातच प्रमुख धरणांमध्ये अल्प पाणी शिल्लक आहे. गतवर्षी कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षी कमी पावसामुळे प्रमुख धरणे पूर्ण भरलेली नाहीत.

धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतील पाणीपातळी खूपच कमी आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यासह सातारा तालुक्यासाठी उरमोडी धरण महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सर्वात भीषण स्थिती उरमोडी धरणातील झाली आहे. या धरणात केवळ ०.४३ टीएमसी पाणी आहे. एकूण क्षमतेच्या अवघे साडेचार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून ३९.४२ टीएमसी पाणी शिल्लक होते. आता धोम-बलकवडी धरण कोरडे पडले आहे. तारळी धरणातही पाणीसाठा कमी झाला आहे. या धरणात २४.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत या धरणात निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. धोम धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना व कण्हेर धरणात पाणीसाठ्याची परिस्थिती बरी आहे.