सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसोबत अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, अन्वर पाशा खान, संदीप माने, जगन्नाथ कुंभार आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर संकट आल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. तसेच विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायलाच हवी, पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी व्हावी, महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढत असल्याने दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाला हमीभाव एनयात यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.