20 वर्षापासून साताऱ्यात काँग्रेसचा झेंडा गायब, पण दांडा शाबूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा एकेकाळचा काँग्रेसचा अभेद्य गड. या जिल्ह्यानं काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेचा सुवर्णकाळ पाहिला. परंतु, मागील २० वर्षांपासून जिल्ह्यातून काँग्रेसचं चिन्हच गायब झालं आहे. त्यामुळं काँग्रेसजनांना मित्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणावं लागत आहे. झेंडा मित्र पक्षाचा असला तरी त्या झेंड्याला दांडा मात्र काँग्रेसचाच दिसतोय.

उदयनराजेंच्या अपक्ष उमेदवारीनं काँग्रेस उमेदवाराचा पराभव

सातारा लोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचा शिवसेनेच्च्या हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी पराभव केला. त्यावेळी अपक्ष उमेदवार छ. उदयनराजे भोसलेंनी घेतलेल्या १ लाख १३ हजार मतांमुळे कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेनं सातारा जिल्ह्यात चंचू प्रवेश केला. पण, १९९८ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या अभयसिंहराजे भोसले यांनी हिंदुराव नाईक-निंबाळकरांचा पराभव केला. पुढे १९९९ ला राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील विजयी झाले, तर काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव खर्डेकर-निंबाळकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर २००४, २००९, २०१४, २०१९ असा सलग राष्ट्रवादीच्या घड्याळाचाच गजर राहिला.

2004 पासून काँग्रेसचा हात गायब

काँग्रेस एकसंघ असेपर्यंत सातारा आणि कराड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे चिन्ह आणि झेंडा डौलानं फडकत होता. १९९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. कराड दक्षिणचे काँग्रेस नेते विलासराव उंडाळकर वगळता जिल्ह्यातील सर्व नेते शरद पवारांबरोबर गेले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, असा सामना झाला. कराड मतदार संघात काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी, तर सातारा मतदार संघात शिवसेनेच्या हिंदुराव नाईक निंबाळकरांचा राष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव पाटलांनी पराभव केला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युपीएमध्ये (संयुक्त पुरोगामी आघाडी) सामील झाला. पुढील निवडणुकांमध्ये विद्यमान खासदार असणाऱ्या पक्षांनाच जागा देण्यात आल्यानं काँग्रेसचं चिन्हच जिल्ह्यातून गायब झालं.

सलग 4 टर्म काँग्रेस करतेय राष्ट्रवादीचा प्रचार

आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविताना ज्या पक्षाचा विद्यमान खासदार त्या पक्षाला जागा सोडण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानुसार २००४ मध्ये कराड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी मिळाली. त्यावेळी मित्र पक्ष काँग्रेसने प्रचाराची धुरा सांभाळत त्यांना निवडून आणलं, तर साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार लक्ष्मणराव पाटील यांचा काँग्रेसनं प्रचार करून त्यांना निवडून आणलं. २००४, २००९, २००४ आणि २०१९ अशी चार टर्म सातारा जिल्ह्यातील काँग्रेसजनांना घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला आणि काँग्रेसनं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचं काम इमाने इतबारे करून दाखवल.

पुनर्रचनेत कराड लोकसभा मतदार संघ रद्द

मतदार संघांच्या पुनर्रचनेत २००९ ला कराड लोकसभा मतदार संघ रद्द होवून सातारा हा एकच मतदार सघ बनला. त्या निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. कराड दक्षिणमध्ये विलासकाका उंडाळकरांनी उदयनराजेंच्या प्रचाराची सभा घेतली होती. त्या सभेत उंडाळकरांच्या समर्थकांनी काँग्रेसचं निवडणुकीतील महत्व अधोरेखित करताना ‘झेंडा कुणाचाही असला तरी दांडा आमचाच असल्याचं सांगत काँग्रेसचा उमेदवार आणि चिन्ह नसलं तरी आमची ताकद निर्णायक आहे, हेच सूचित केलं होतं. त्याची प्रचिती देखील वेळोवेळी आली.