रेल्वे प्रवाशांसाठी वाईट बातमी; ‘या’ एक्स्प्रेसला सांगली, कराडमध्ये थांबा नाकारला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्यामुळे प्रवाशांकडून नेहमी रेल्वेतून प्रवास अधिक पसंती दिली जाते. मात्र, काही एक्स्प्रेस रेल्वेगाडयांच्याबाबतीत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना संताप येईल असे निर्णय घेतले जातात. अशाच बंगळुरू – भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला एकूण प्रवासात ३७ थांबे मंजूर केले असताना सांगली व कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर थांबा नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या विरोधात प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला असून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे याप्रकरणी संघटनांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

देण्यात आलेल्या तक्रारीत पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीने असे म्हटले आहे की, बंगळुरू-भगत की कोठी एक्स्प्रेस (क्र. ०६५८७/०६५८८) या वातानुकूलित गाडीला सांगली व कराडचा थांबा नाकारण्यात आला आहे. या गाडीच्या मार्गावरील ३७ स्थानकांवर थांबा मंजूर आहे. मात्र, पुणे विभागातील सांगली आणि कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेला नाही. सांगली आणि कराडच्या तुलनेत कमी उत्पन्नाच्या २५ स्थानकांवर या गाड्या थांबतात.

सांगली आणि कराडच्या जनतेवर हा अन्याय आहे. राजस्थान एसी ट्रेन क्रमांक १९६६८ साठी सांगली थांब्याचे प्रति फेरी उत्पन्न १ लाख रुपये आहे. राणी चेनम्मा एक्स्प्रेसचे सांगली स्टेशनचे दैनंदिन उत्पन्न १.२ लाख रुपये आहे. सांगली स्थानकातील मुंबई गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न ८० हजार रुपये प्रति फेरी इतके आहे. कराड स्थानकाचे विविध गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न सरासरी सुमारे ५० हजार रुपये आहे. हे उत्पन्न रेल्वेच्या लेखी खूप चांगले आहे.

एक्स्प्रेसला कराडला थांबा देण्याबाबत मागणी केली आहे : गोपाल तिवारी

बंगळुरू – भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला सांगली, कराडमध्ये थांबा नाकारण्यात आल्यानंर याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ ने पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी याच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी या एक्स्प्रेसला कराड आणि सांगली या दोन रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी आम्ही विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीवेळी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.