आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांमध्ये राज्यात अग्रेसर ठरला आहे. मागील ३० दिवसात १ लाख ३९ हजार ३५ तर मागील ७ दिवसात ८८ हजार ८४६ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.

सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या दोंन्ही योजनेमध्ये १७ लाख ६२ हजार ९०० लाभार्थ्यांचा समावेश असून त्यापैकी ८ लाख २ हजार ८५९ इतके लाभार्थी आयुष्मयान भारत योजनेतील तर ९ लाख ६० हजार ४१ इतके लाभार्थी महात्मा ज्योतिराव फुले योजनेतील आहेत.त्यापैकी आजअखेर ३ लाख ५ हजार ८४६ लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या नोंदणी व वितरणासाठी प्रशासनामार्फत शिबीरे घेण्यात येत आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये ई-कार्ड नोंदणीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र व जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवक, परिचारिका, आशा सेविका यांच्याकडे आधार कार्ड देऊन नोंदणी करावी. त्याचबरोबर लाभार्थ्यांनी स्वत:च्या ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये प्ले-स्टोअरमधून आयुष्यमान भारत ॲप घेऊन त्याद्वारेही नोंदणी करावी, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी केले आहे.