कराड प्रतिनिधी । देशभरासह राज्यात नुकताच २६ वा शहीद दिन साजरा करण्यात आला. कराड तालुक्यातील अंतवडी गावचे सुपुत्र आणि कारगिल युद्धात शौर्याने लढणारे शहीद वीर जवान महादेव यशवंत निकम यांच्या स्मारकास कराड तालुका प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आणि नायब तहसीलदार बाबुराव राठोड यांच्या हस्ते शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. अमृत वीर जवान अभियानचे तालुका अध्यक्ष आणि सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी देखील अभिवादन केले. कार्यक्रमात शहीद जवानांचे वडील श्री. यशवंत निकम आणि पत्नी श्रीमती उज्ज्वला निकम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सातारा जिल्ह्यातील इतर शहीद जवानांच्या वीर पत्नी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा स्मृतीचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
१९९९ साली ३ मे ते २६ जुलै दरम्यान भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने टोलोलिंग, टायगर हिलसारखी महत्त्वाची शिखरे जिंकून २६ जुलै रोजी अंतिम विजय मिळवला. याच युद्धात २६ जून १९९९ रोजी महादेव निकम यांनी वीरमरण पत्करले. या कार्यक्रमाला आजी-माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीय, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला, ग्रामस्थ तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.