महायुती आमच्यामुळे झाल्याचे सांगत आठवले गटाच्या अशोक गायकवाडांनी दिला ‘हा’ इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात महायुतीतून खा. उदयनराजे भोसले यांना लोकसभेची खासदारकीची उमेदवारी देण्यात यावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात असताना साताऱ्यातील ‘रिपाइं’ आठवले गटाकडून महायुतीला इशारा देण्यात आला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. पण, उमेदवारीत त्यांच्याच सातारच्या गादीचा अवमान झाला आहे. जर खा. उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिली तर ‘रिपाइं’ला सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघ सोडावा. कारण महायुती आमच्यामुळे झाली असून सत्ता कशी बदलायची हेही आम्हाला माहीत आहे, असा इशारा ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आज दिला.

‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आण्णा वायदंडे, आप्पा तुपे यांच्यासह ‘रिपाइं’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गायकवाड म्हणाले की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे युतीची महायुती झाली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत देशात आणि राज्यातही सत्ता प्राप्त झाली. लोकसभा निवडणुकीत सातारची जागा महायुतीतील ‘रिपाइं’ला देण्यात आली. पण, गद्दारी झाली. तरीही आम्ही शांत आहे.

आता २०२४ ची निवडणूक असली तरी आम्हाला महायुतीतून बाहेर पडल्यासारखे वाटत आहे. तसेच उमेदवारीत सातारच्या गादीचा तसेच ‘रिपाइं’चाही अपमान झालेला आहे. त्यामुळे मागे हटायचं नाही, तर नेटाने लढायचं असं ठरवलंय. तरीही अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे संबंधितांनी सुधारणा करावी. कारण, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमची एक लाखतरी मते आहेत. ही मते मिळाली नाहीतर भाजप ४०० जागांचा आकडाही पार करणार नाही. प्रसंगी आम्ही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू. याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊन आम्हाला सन्मान द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.