सत्यता प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील कांदाटी खोऱ्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या भागातील १५ गावांमध्ये २२१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे येथील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कांदाटी खोरे हा भाग निसर्गाच्या संपन्नतेने परिपूर्ण असून, पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात वसलेला आहे. या भागातील विरळ लोकसंख्या असलेली गावे पर्यटनासाठी आकर्षक ठिकाणे बनत आहेत. केंद्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे २०२५” या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान घरकुल आवास योजना टप्पा दोन अंतर्गत कांदाटी खोऱ्यातील १५ गावांमध्ये २२१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांचा अभ्यास दौरा या दुर्गम भागात आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात शासनाच्या विविध घरकुल योजनांविषयी जनजागृती करण्यात आली आणि प्रत्येक गावात पात्र लाभार्थींच्या घरकुलांचा पायाभरणी कार्यक्रम याशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला.