कराड प्रतिनिधी । सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १७ उमेदवारी अर्ज दुबार होते. त्यामुळे २१ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २९ उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान दाखल अर्जापैकी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. त्यावर आज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज बाद करण्यात आल्याच्या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाला मोठा धक्का बसला आहे.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी तब्बल १५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, जाधव यांच्या उपस्थितीत त्या अर्जाची गुरुवारी छाननी करण्यात आली. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी गटनिहाय करण्यात आली. उमेदवार अर्जाची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली.
त्याची सुनावनी निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर पार पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी निवास थोरात व मानसिंगराव जगदाळे यांचे दोन्ही अर्ज बाद करण्यात आले. ही घटना दोन्ही गटांसाठी मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे.