कराड प्रतिनिधी | “अलीकडे दोन्ही नेते महाराष्ट्राला शान होणार नाहीत अशी विधाने करतात. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवण दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिली. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बोलताना कायदा आणि सुव्यस्थेच भान राखावे, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे व जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर दिली. तसेच जो पर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची विचारधारणा सोडणार नसल्याचे देखील पवार यांनी म्हंटले.
दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती असून त्यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. यशवंतराव चव्हाणांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाणांची विचारधार कधीही सोडणार नाही” “जो पर्यंत मी राजकीय जीवनात आहे, तो पर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापी सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राच भलं होणार, सगळ्या समाजाच भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याच काम होणार आहे,”
इतिहास आपण वाचला आहे. इतिहासात अनेक मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तक लिहिली आहेत, इतिहासाच संशोधन केलं आहे. इतिहासाची माहिती खोलवर मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील. त्यांनी अस वक्तव्य का केलं? त्यांच्या वक्तव्यामागचा हेतू माहित नाही, पंरतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे जो मुस्लिम घटक आहेत, ते देशप्रेमीच आहेत” असं अजित पवार म्हणाले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सर्वसामान्यांना न्याय देणार
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करीत आहे. त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम शासन करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी समाजामध्ये समतेचा भाव निर्माण केला. त्यांचा आदर्श आजच्या नव्या पिढीने घ्यावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केले.
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासाठी ही प्रयत्न केले जातील असेही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी म्हंटले.