केंद्र सरकारच्या कामामुळे नागरिकांच्या जीवनात परिवर्तन – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील जे पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत, अशा वंचित लाभार्थ्यांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले.

खटाव तालुक्यातील गोरेगाव (वांगी) येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, धैर्यशील कदम, अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. मिश्रा म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. या यात्रेची सुरुवात 15 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. ही यात्रा ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन तेथील वंचित लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. हे या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

ग्रामीण भागातील एकही पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या गावांमध्येच शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. स्टॉलला भेट देऊन पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. मिश्रा यांनी यावेळी केले.

या यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यात आल्या. तसेच यावेळी उपस्थितांनी भारत विकास करण्यासाठी संकल्प शपथ घेतली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.