मुंबईला 55 प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला कराडच्या तासवडे टोनाक्यावर भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अपघाताच्या तसेच अचानक पेट घेण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड तालुक्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका परिसरात घडली. या ठिकाणी मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसने अचानक पेट घेतला. यावेळी लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली तर आगीत १५ ते २० लाखांचे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजहून प्रवासी घेऊन खासगी बस क्रमांक (MH 03 CP 4500) ही मुंबईच्या दिशेने निघाली होती. बस मध्ये 55 प्रवासी प्रवास करीत होते. बस तासवडे टोलनाकयावर आली असता बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बस चालकासह इतर वाहनधारकांनी बस चालकासह प्रवासी व तासवडे टोल व्यवस्थापनाला दिली. बस चालकाने तात्काळ बस महामार्गाच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले.

तसेच यावेळी त्याठिकाणी तासवडे टोलव्यवस्थापन, महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान,
कराड नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर पोहचली. अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्यानंतर सुमारे तासभर सुरु असलेली आग काही वेळातच आटोक्यात आली.

अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेत बसचे सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे आणि प्रवाशांचे प्रवासी बॅगेतील साहित्य जळून मोठे नुकसान झाले.