सव्वा कोटींच्या वीजचोरी प्रकरणी ‘महावितरण’कडून 374 ग्राहकांकडून 1 कोटीचा दंड वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्य वीज वितरण मंडळाने तथा महावितरणच्या कर्मचऱ्यांकडून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी करण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल 374 जणांनी बेकायदा वीज वापर करून वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. आशा लोकांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे 1 कोटीचा म्हणजे 98 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज ग्राहकांना त्यांच्याकडून वापरलेल्या वीज वापराचे बिल प्रत्येक महिन्याला ग्राहकाला देत असते. एखाद्या ग्राहकाने विज बिल भरले नाही, तर महावितरणकडून त्या ग्राहकाचे वीज जोडणी तात्पुरती तोडली जाते. महावितरण कंपनीने वीज कनेक्शन बंद केल्यास काही ग्राहकांकडून परस्पर बेकायदेशीरपणे वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी केली जाते. अशा आकडा टाकणाऱ्यांवर वीजवितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे.

मागील वर्षभरात विशेष भरारी पथकामार्फत संबंधित वीजचोरी करणाऱ्यांच्या जागेवर छापा टाकत वीज चोरी उघडकीस आणली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आकडा टाकून वीज चोरणाऱ्या 374 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे 1 कोटीचा तब्बल 98 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे; मात्र, प्रत्यक्षात वीज गळती आणि वीज चोरीमुळे महावितरणला 1 कोटी 35 लाख रुपयांचा फटका बसला आहे. महावितरणच्या विजेचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणे, आकडा टाकणे अथवा मीटरमध्ये छेडछाड करणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. गेल्यावर्षी अशाप्रकारे उद्योग करणाऱ्या चार मोठ्या ग्राहकांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्याची कारवाई देखील केली आहे.