सातारा प्रतिनिधी | मतदार याद्यांतील गैरप्रकार कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने नुकतीच एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परीक्षित वीरेंद्र जगताप हे सदस्य आहेत, तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत. मतदार याद्यामधील गैरप्रकाराबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यावर आयोगाने समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोटाळे करत आहे.
निवडणूक आयोगाला हाताशी धरुन भाजपानं चोरीच्या मार्गानं सत्ता मिळवली पण यापुढं असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील, यावर उपाय सूचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.